नवी दिल्ली :
देशांतर्गत प्रवासी विमानसेवा टप्याटप्याने सुरु करण्यात येत असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र अद्यापही सुरु झालेली नाही. जगावर असलेलं कोरोनाचं संकट अद्यापही कमी झालेलं नाही. यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५ जुलैपर्यंत प्रस्तावित असणारी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणं रद्द असणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे.
आदेशात देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा आदेश आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपररेशन तसंच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून संमती मिळालेल्या विमानांना लागू असणार नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे देशातील सर्व व्यावसायिक विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. विमान सेवा क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सोमवार, २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.