नवी दिल्लीः
कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असतानाच या संकटाच्या काळात सरकारने सामान्य करदाते आणि व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तातडीने पाच लाख रुपयांपर्यंतचा कर परतावा देण्याचे आदेश दिले असून, या निर्णयाचा फायदा 14 लाख करदात्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने जीएसटी आणि कस्टमच्या करदात्यांचा कर परतावा देण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे 1 लाख व्यावसायिक आणि एमएसएमईला दिलासा मिळणार असून, सरकार एकूण 18 हजार कोटींचा परतावा देणार आहे.
कर परतावा भरल्यानंतर ई-पडताळणी केली जाते. यानंतर आयकर परतावा मिळण्यास सुमारे 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो. बर्याच वेळा परताव्याची रक्कम फक्त 15 दिवसांतच जमा होते. प्राप्तिकर परताव्याच्या ई-पडताळणीनंतरच परतावा प्रक्रिया सुरू होते. प्राप्तिकर परताव्याची स्थिती प्राप्तिकर ई-फाइलिंग पोर्टल आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर पाहायला मिळू शकते. करदात्यांना तेथे त्यांचा पॅन नंबर आणि मूल्यांकन वर्ष भरावं लागतं.
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, 1 मार्च 2019पासूनच ई-परतावा मिळणार आहे. हा परतावा फक्त पॅन कार्डशी जोडलेल्या बँक खात्यांत जमा होणार आहे. तसेच आयकर ई-फायलिंग केलेली असून, त्याची पडताळणी www.incometaxefiling.gov.inवर झाली असल्यास त्यांना याचा लाभ मिळणार आहे.