नवी दिल्ली :
यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढ शून्य टक्के राहिल असं भाकित मूडीजने वर्तवलं आहे. शुक्रवार, ८ मे रोजी मूडीजने सादर केलेल्या अहवालानुसार लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची मोठी पडझड होण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थ्यवस्थेची वाढ शून्य टक्क्यांवर अडकून राहिल म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था जैसे थे परिस्थितीत असेल असं मूडीजने म्हटलं आहे. मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे. २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ६.६ टक्क्यांपर्यंत असेल असंही या अहवालात म्हटलं आहे.शुक्रवारी जारी केलेल्या अहवालामध्ये वित्तीय तूट (फिस्कल डेफिसिट) ५.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय तूट ही ३.५ टक्के असेल असं सांगितलं होतं.
सेन्सेक्सने गाठला ३१६८५.७५ अंकांचा टप्पा
करोनामुळे भारत पूर्णपणे थांबला असून याचा परिणाम यंदाच्या आर्थिक वर्षावर मोठ्या प्रमाणात दिसून येणार असल्याचे संस्थेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मागील बऱ्याच काळापासून असणारे आर्थिक संकट, नोकऱ्यांचा आणि रोजगाराचा प्रश्न तसेच आता देशातील बिगरबँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आर्थिक संकटात सापडल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल असं मूडीजने म्हटलं आहे. या तीन क्षेत्रांना बसलेल्या फटक्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील संकटे वाढण्याची चिन्ह दिसत असल्याचा इशाराही मूडीजने दिला आहे.राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही तर अर्थसंकल्पात होणारी वित्तीय तुटीकडे दूर्लक्ष करुन सरकारला योजनांसाठी पैसे द्यावे लागतील असं मूडीजने म्हटलं आहे.
अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल